ऐतिहासिक वास्तू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहा साठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऐतिहासिक वास्तू संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ऐतिहासिक बाज कायम ठेवून पूर्वी होतं तसं नाट्यगृह युद्धपातळीवर पुन्हा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कोल्हापूर दि. १० : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं, हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे.या नाट्यगृहाशी कलाकार,रसिक आणि कोल्हापुरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली. त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ८ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा ५ कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला.

उपस्थित माध्यमांशी संवाद साधून त्यांच्यामार्फत त्यांनी कोल्हापूरमधील नागरिकांना आवाहनही केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं असतं. जशा कोल्हापूरवासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला खूप फोन आले, खूप मेसेजेस आले. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं असून कलावंत आणि श्रोत्यांचादेखील आदर करणारं शासन आहे. ते पुढे म्हणाले, स्थानिक कलावंतांशी संवाद साधल्यानंतर नाट्यगृहाशी भावनिक नातं किती घट्ट होतं याची एक प्रचिती येते. नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, याबाबत फॉरेन्सिंक विभाग व पोलीस विभाग या घटनेची चौकशीही करीत आहेत. परंतु हे नाट्यगृह उभे पुन्हा राहणं हे महत्त्वाचं आहे. चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्याच्यावर पुढे कारवाईही होईल.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading