मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा

मुंबई / DGIPR ,दि.२१ ऑक्टोबर २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे.याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती कळविलेली असून ती खालीलप्रमाणे आहे :

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील एकूण मतदार 9 कोटी 29 लाख 43 हजार 890 होते. 20 ऑक्टोबरपर्यंत 36 लाख 31 हजार 279 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे आणि 20 ऑक्टोबर रोजी एकूण 9 कोटी 65 लाख 5 हजार 958 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसऱ्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (SSR-2024) प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी उपलब्ध होता आणि या दावे व हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी नियमानुसार योग्य प्रक्रिया अवलंबली आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950, मतदार नोंदणी नियम 1960 आणि भारत निवडणूक आयोगाच्या 11 ऑगस्ट 2023 च्या पत्रातही मतदार यादीबाबत तरतुदी नमूद केल्या आहेत. या तरतुदींनुसार फॉर्म क्रमांक 6 सादर करून मतदार यादीतील नाव नोंदले जाऊ शकते आणि फॉर्म क्रमांक 7 सादर करून वगळले जाऊ शकते. फॉर्म क्रमांक 8 सादर करून मतदाराच्या नोंदीमध्ये कोणताही बदल (नाव, पत्ता, बदलणे इ.) करता येईल आणि हे सर्व फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत.दावे आणि हरकतींसाठी सात दिवसांची नोटीस देण्याची तरतूद आहे.आक्षेपांचा योग्य विचार केल्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी योग्य ते निर्णय घेतात. ‌


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading