भक्ती सागर येथे प्रशासनाच्या आगाऊ प्लॉटस नोंदणी आवाहनाला दिंडीचालकांचा प्रतिसाद
भाविकांना 65 एकर येथे 374 प्लॉटचे वाटप- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०७/२०२४- आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.17 जुलै रोजी साजरा होत आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 497 मोफत प्लॉटस भाविकांना तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. दि.13 जुलै पर्यंत 374 प्लॉट तर 65 एकर शेजारील खुल्या जागेतील 143 प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. या ठिकाणी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासना कडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भक्ती सागर येथील आगाऊ प्लॉटस नोंदणीबाबत प्रशासनाच्या आवाहनाला दिंडी चालकांनी उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम यांच्या पालख्यांचे जिल्ह्यात दि. 11 व 12 जुलै रोजी आगमन झाले आहे. तसेच अनेक संतांच्या पालख्या, दिंड्यांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी-भाविकांना पालखी तळांवर, मार्गावर प्रशासनाकडून सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात्रा कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. तसेच त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिडींच्या मुक्कामासाठी भक्ती सागर (65 एकर) तसेच पंढरपूर शहरालगत नव्याने पाच ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 65 एकरावर दिंड्या येण्यास सुरुवात झाली असून प्रथम येणाऱ्या दिंड्याना प्राधान्य देण्यात येत आहे.

भक्ती सागर (65 एकर) येथे भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, मुबलक शौचालय, वीज, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र स्वच्छता आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जातात. या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. भक्ती सागर (65 एकर ) येथे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी सेक्टर मॅनेजर म्हणून तहसिलदार सचिन मुळीक यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाविकांना प्लॉटस वाटप करणे, अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर व त्याचे अधिनस्त कर्मचारी 24 तास कार्यान्वित असणार आहेत. वारकरी भाविकांनी भक्ती सागर (65 एकर) व नव्याने 5 ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
