साहित्य संमेलनातून विचारांना नवी दिशा- आ. अभिजीत पाटील

दै.पंढरी भूषण,सा.दीपज्योती रणरागिणी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न

साहित्य संमेलनातून विचारांना नवी दिशा- आ.अभिजीत पाटील

महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता-आ.राजू खरे

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-दै.पंढरी भूषण व सा.दीपज्योतीने रणरागिणी साहित्य संमेलन घेवून महिला साहित्यीकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारून त्यांच्यासाठी स्वतंत्र रणरागिणी पान उपलब्ध करून दिल्याने त्यांना लिहिण्यास स्वतंत्र विचारपीठ निर्माण झाले आहे.महिलांसाठी अशा पध्दतीचे पहिले साहित्य संमेलन एका वृत्तपत्राच्या माध्यमातून घेतले जात असावे असे मला वाटते.साहित्य संमेलन वेगवेगळ्या स्थरातून होत असते.परंतू संपादक शिवाजी शिंदे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून अशा लेखिकांसाठी साहित्य संमेलन घेवून त्यांचा गौरव केला आहे.या साहित्य संमेलनातूनच विचारांना नवी दिशा मिळते असे गौरवोद्गार संमेलनाचे उद्घाटक माढा विधानसभा मतदार संघाचे आ.अभिजीत पाटील यांनी काढले.

संमेलनाच्या रणरागिणींचे पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन मोहोळ मतदार संघाचे आ. राजाभाऊ खरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.राजाभाऊ खरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, महिला सबलीकरण यावर आपली भूमिका मांडून महिलांनी यापुढे कोणत्याही अडचणींना खचून न जाता स्वतः पुढे आले पाहिजे. कोणत्याही प्रसंगात खचून न जाता रडायचे नाही तर लढायचे, हे ब्रीद वाक्य सांगितले. महिलांच्या अडीअडचणींसाठी आ.राजाभाऊ खरे हा तुमच्या सोबत असेल. दै.पंढरी भूषण व सा. दीपज्योतीच्या माध्यमातून रणरागिणी साहित्य संमेलन घेवून माझे मित्र संपादक शिवाजी शिंदे यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशात असे महिलांसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून साहित्य संमेलन घेतल्याने त्याचा आम्हाला अभिमान तर वाटतोच, पण या महिला साहित्यीकांसाठी, साहित्य लिहिण्यासाठी दिशा देण्याचे काम केले आहे.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर यांनी दै.पंढरी भूषण व सा. दीपज्योतीच्या खडतर प्रवासाविषयी माहिती देवून रणरागिणी साहित्य संमेलन घेतल्याने महिलांमध्ये लिहिण्याची ऊर्जा प्राप्त झाली असल्याचे सांगितले.

प्रमुख वक्ते माजी मुख्याध्यापक आदिनाथ गाडे यांनी कॉलेजचे प्रांगण थरथरून सोडले. त्यांची बुध्दीमता व कौशल्य, त्यांनी मांडलेल्या शब्दातून सर्व रणरागिणींना ऊर्जा मिळाली आहे.संपादक शिवाजी शिंदे हे वैभवसंपन्न व्यक्तीमत्व दै.पंढरी भूषणच्या माध्यमातून लाभल्याने अशा उपेक्षित महिला साहित्यीकांसाठी आज हे साहित्य संमेलन संपन्न होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये संपादक शिवाजी शिंदे यांनी सांगितले की,आज अनेक वृत्तपत्रांमधून मोठमोठे साहित्यीक आपले साहित्य प्रकाशित करतात.काही वृत्तपत्र त्यांना मानधन देतात तर काही देत नाहीत.परंतू दै.पंढरी भूषण व सा.दीपज्योती गेल्या 2 वर्षापासून रणरागिणीचे पेज तयार करून उपेक्षित महिला साहित्यकांना एक स्वतंत्र विचारपीठ निर्माण केले आहे.अशा साहित्यकांसाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गेल्यावर्षीपासून दै.पंढरी भूषण व सा. दीपज्योती रणरागिणी साहित्य संमेलन घेत आहे.या संमेलनामध्ये कथा,काव्य वाचन घेतले जाते.अनेक रणरागिणींना मनमोकळेपणाने विचार मांडता येतात. रणरागिणींसाठी उत्कृष्ठ साहित्य लेखिका पुरस्कार देवून गौरविण्यात येते. ज्या लेखिकांनी रणरागिणी पेजसाठी आपले साहित्य प्रकाशित केले आहे अशा साहित्यीकांवर त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले जात आहे.राज्यात नव्हे तर देशात एका वृत्तपत्राच्या माध्यमातून हे साहित्य संमेलन घेतले जात आहे.

यावेळी पारितोषिक व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षा उल्का कदम-पाटील यांनी आपले भाषणातून महिला साहित्यकांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करून चूल व मूल हे आता पडद्याआड गेले आहे. महिलांना आता स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी आता 50 टक्के आरक्षण मिळाले आहे त्या पध्दतीनेच कामे केली पाहिजेत.आपले विचार चांगले ठेवून कुटुंबाचा विकास केला पाहिजे.या साहित्य संमेलनातून तुम्हाला खूप काही मिळाले आहे.पुढील संमेलनात अनेक साहित्यीकांच्या पुस्तकांचे प्रकाशन व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात रणरागिणींनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कथेचा सारंश यावर विचार मांडले. काही कवयित्रींनी कविता सादर केल्या. त्यामुळे हे साहित्य संमेलन फुलून आले.कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणा चव्हाण व काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनघा सावर्डेकर या होत्या.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रा. सविता दुधभाते यांनी केले. कार्यक्रमास पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव बागल,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने रणरागिणी उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक अमोल शिंदे, कार्यकारी संपादक श्रीनिवास शिंदे, उपसंपादक सावता जाधव, शिवकुमार भावलेकर व संपूर्ण टिमने परिश्रम घेतले.

खर्‍या अर्थाने महिलांना स्वतंत्र विचारपीठ

एका टांगेवाल्याचा मुलगा चळवळीतून पुढे आला.मोहोळ विधानसभेचा आमदार झाला. खर्‍या अर्थाने जनसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.मी प्रामुख्याने सध्या महिलांचे प्रश्‍न सोडविण्याकडेच जास्तीत जास्त लक्ष दिले आहे. महिलांना कशाप्रकारे संरक्षण मिळावे, महिला सबलीकरण झाले पाहिजे,महिलांनी जशासतसे उत्तर द्यायला शिकले पाहिजे.माझे मित्र संपादक शिवाजी शिंदे व मी कॉलेज जीवनापासून मित्र आहोत.आजही आमची मैत्री तशीच आहे. त्याच्या पाठीशी मी सदैव आहेच.रणरागिणी साहित्य संमेलन घेवून खर्‍या अर्थाने महिलांना स्वतंत्र विचारपीठ निर्माण केले आहे.संपादक पुर्वीपासूनच धडपड्या आहे. त्यांनी स्वतःसाठी आजपर्यंत काही कमावले नाही.परंतू आपल्या कामातून मोठ्या प्रमाणात माणसे मिळविली. काही माणसांना त्यांनी मोठे केले असल्याचे प्रत्यक्ष नजरेने पाहिले आहे – आ.राजाभाऊ खरे

मी आमदार बोलतोय पुस्तक लिहावेसे वाटते

आमदार झाल्यापासून तीन महिन्यांमध्ये खूप काही शिकायला मिळत आहे.यावरसुध्दा मी आमदार बोलतोय हे पुस्तक तयार होईल. मी आमदार झाल्यापासून अनेकांचे फोन येत आहेत.काही फोन रात्री-मध्यरात्रीसुध्दा येत आहेत.अशावेळी फोन न उचलल्यास ते म्हणतात की,निवडणुकीच्या अगोदर फोन केला की उचलत होता मग आता का उचलत नाही ? त्यावेळी त्यांचे मिसकॉल पाहिल्या नंतर ज्याचे सर्वात जास्त मिसकॉल आहेत त्याचे उदाहरण देताना त्याला कामाविषयी विचारले,एवढे मिसकॉल का केले ? तर तो म्हणतो,अहो आबा तुम्ही पहिले लगेच फोन उचलत होता, आता का उचलत नाही.मी त्याला म्हटले,तुझे काम सांग. तर तो म्हणतो, काय नाही तुम्हाला तिळगुळ घ्या,गोड बोला म्हणायचे होते.असे फोन रात्री-मध्यरात्री येतात. त्यावेळी आपण ओळखायचे की, तो व्यक्ती निश्‍चितच कोणत्यातरी हॉटेल किंवा ढाब्यावर आहे.कारण त्याला दाखवायचे असते की, बघा आमदार माझा फोन लगेच उचलतो की नाही. असे अनेक किस्से सांगून मी आमदार बोलतोय हे पुस्तक प्रकाशित करावेसे वाटते – आ.अभिजीत पाटील


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading