सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल…विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे

सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल…विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांचे आमदारांना आवाहन…

दिल्ली येथील विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा समारोप

नवी दिल्ली – सभागृहाच्या कामकाजात शेवटपर्यंत सहभागी होण्याची तुमची तयारी असेल तर जनतेच्या प्रश्नावर न्याय मिळवणे शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.दिल्ली येथील विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या भाषणाने झाला.नवीन सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी पीठासीन अधिकारी प्रयत्न करत असतात असेही डॅा.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

लोकसभेच्या प्रशिक्षण संस्थान PRIDE द्वारे आयोजित या कार्यक्रमात विधीमंडळीय मसुदा लेखन (लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग) कौशल्य आणि संसदीय समित्यांच्या कार्यकुशलतेचे महत्त्व डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

पुढे बोलतांना विधानपरिषेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की आपण आमदार झाला आहात.खरेतर आमदार होणे ही अत्यंत कठीण गोष्ट असते.आमदार झाल्यावर कुठलेही संसदीय आयुध वापरणे अवघड नाही.फक्त आयुधं कधी वापरायची याचा हळूहळू आपल्याला अनुभव येईल.या प्रशिक्षणासाठी नविन ७५ पैकी ५१ सदस्यांनी उपस्थिती दर्शवली, सहभाग घेतला ही मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी विशद केले.आमदार झाल्यानंतर लोकसभेत येणे,अनुभव घेणे, विधानसभा,विधानपरिषदेची वैशिष्ट्ये काय आहेत,कायद्याची प्रक्रिया काय आहे,समिती व्यवस्थापन म्हणजे काय,विशेष हक्क कशासाठी,संसदीय कार्यपद्धती या सगळ्यांबाबत आपल्याला अभ्यासू व्यक्तींची व्याख्याने ऐकायला मिळाली. आपणही प्रश्न विचारलेत याचे कौतुक वाटले.यावरून आपला याबद्दल अभ्यास झाला असावा असे डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या.गेल्या 22 वर्षांपासून मी विधानपरिषदेची सदस्य आहे.विधानपरिषद, विधानसभा ही मोठी सभागृह आहेत. विधानसभेत मतदारसंघाची मोठी जबाबदारी असते त्यासाठी तुम्हाला सातत्याने त्या मतदारांचा विश्वास जिंकावा लागतो. विधानपरिषदेत कुणाचा काय परफॉर्मन्स आहे याकडे संबंधित पक्षाचे लक्ष असते.मतदारसंघातील लोकांचे देखील याकडे बारीक लक्ष असते.विधानसभा किंवा विधान परिषदेत यशस्वी होण्यासाठी हे प्रशिक्षण फायद्याचे ठरेल.सर्वानी केलेल्या सूचनेनुसार अधिवेशनाच्या अगोदर दोन दिवसांचे कृती सत्र घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे व अधिवेशन काळात हे कृती सत्र घेता येईल का? याचा विचार सुरु असल्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी विधानपरिषदेतील आपले अनुभवही कथन केले. विधानपरिषदेत आपण गेलो तेव्हा शिवसेनेची फर्ड्या वक्त्यांची मोठी फळी सभागृहात होती.माझा नंबर अगदी शेवटी असायचा.त्यामुळे मला बोलण्याची कमी वेळ संधी मिळायची.मात्र कितीही कमी वेळ मिळाला तरीही त्यावेळेत नेमके मुद्दे मांडायला मी शिकले. सभागृहात प्रस्तावाचा वेळ असतो तो कोणाला द्यायचा हे संबंधित पक्ष ठरवतो.सभागृहात अर्धा तास चर्चा यामध्ये दुर्लक्षित प्रश्नामध्ये न्याय मिळू शकतो यासाठी तुमची शेवटपर्यंत सभागृहात बसण्याची तयारी असायला हवी असेही मार्गदर्शन डॉ.नीलम गो-हे यांनी उपस्थित आमदारांना केले.

विधानसभेत व विधानपरिषदेत आमदार बोलतात त्याचे व्हिडिओ अधिवेशन संपल्यानंतर आमदारांना दिले जातात. ते व्हिडिओ आमदार आपापल्या मतदारसंघात सोशल मीडिया द्वारे पोचवतात.यामधून मतदार संघातील प्रश्न आपला आमदार योग्य प्रकारे मांडतो आहे याचा आणि मंत्र्यांनी दिलेली उत्तरे यामधून लोकांना एक दिलासा मिळतो,असेही डॅा.नीलम गोऱ्हे यांनी आवर्जून सांगितले.

व्यासपीठावर श्री.भोळे, विलास आठवले , लोकसभा प्राईडचे संचालक श्री.मलिक उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading